Sunday, January 22, 2023

स्पिती - हिमाचल 6

 स्पिती - हिमाचल  ६

चंद्रताल चा जायचा रस्ता अति भयानक, म्हणजे खूप खराब आहे, नाहीच म्हणा ना. खूप खडतर  जागा पण डोंगराळ, वेडा वाकडा रस्ता .... एक एक करत पांडव खाली पडले ते नवल नाही. आता तरी रस्ता आहे इतक्या हजारो वर्षां पूर्वी तर काहीच नसेल आणि तो डोंगर, आपण कधी काळी काही वाचलं असतं आणि असं अचानक हे असं समोर आलं ना कि वाटतं हा यार हे तर खरं निघालं.  

चंद्रताल म्हणजे जिथून पांडव स्वर्गात चालत गेले, (म्हणजे एकटा धर्मराजच शेवटी उरला)ते ठिकाण   ... साधारण ३ एक महिनेच फक्त  इथे वावर असतो बाकी बर्फ,  रस्ता बंद. म्हणून असेल म्हणा, पण  रस्ता करतच नाहीत हि लोक. एका तास भर अंतरा करता दोन चार तास जातात , आणि वाहन बंद पडलं काही टायर पंक्चर झाला तर संपलच हो सगळं. पण वरती त्या लेक जवळ, तिथे टेन्ट्स टाकतात लोकं आणि भाड्याने देतात खाणं वगैरे सगळंच. अश्याच एका तंबूत आम्ही आमच्या ब्यागा टाकल्या आणि गाडीत बसून दहा मिंट वर गेलो आणि परत गाडी लाऊन १५ मिनिट तंगड तोड करून चंद्रताल ला पोचलो. चंद्रताल एकक तलाव आहे (lake).  खूप सुंदर अति सुंदर दृश्य चहू बाजूला डोंगर मध्ये निळा शार तो तलाव. त्याचा आकार चंद्रा सारखा आहे म्हणून नाव चंद्रताल असं म्हणतात खरं खोटं माहित नाही , पण रात्री चंद्राचं प्रतिबिं छान दिसतं (असेल पण मी गारठून माझ्या टेन्ट मध्ये ३ स्वेटर tshirt thermal आणि दोन blanket घेऊन कुडकुडत होतो). आम्ही नाही पाहिलं . इथून खरं तर आकाश पण सुंदर दिसतं. खरं सांगू का , मी समुद्र सपाटी वरचा माणूस आहे, मुंबईत जन्म आणि सगळं इथेच आयुष्य गेलं.  बर्फ ग्लासात आणि थंडी फ्रीझर मध्येच.  असं आता अचानक तुम्ही मला धीट हो म्हंटल आणि जा बिन्धास म्हंटल तर कसं चालेल? (९:१८ ला window पकडायचो लेको, गाडीत शिरून दाखवा मग बोला थंडी बद्दल, ज्यादा बोलियाचं काम न्हाय काय समाजलाव ). 

आम्ही त्या तलावा जवळ ...जवळ जवळ तास दीड तास घालवला, खूप शांत होतं  आणि न मला व्यसन आहे पाण्याचं, इतकं सुंदर स्वछ पाणी कुठे दिसतं हल्ली? खप वेळ शान्त पणे बसलो, तिथे खरं तर लोक प्रदक्षिणा घालतात, मला एकट्याला जायला थोडं रिस्की वाटलं, (गर्दीची भीती नाही वाटत एकांताची वाटते) म्हणून फक्त एक ५०० मीटर जाऊन शांत पणे बसून राहिलो, इथे oxygen पण कमी होतं , मधेच काही धाप वगैरे लागलिओ तर ? म्हणून टाळलं, खरं तरच सहज शक्य झालं असतं ४ एक की.मी. आहे. सुकून म्हणतात ना? तो मात्र मिळाला, थोड्या वेळाने  मग पर्यटक आले, खूप गोंगाट झाला.  तिथे नको होता गोंगाट असं वाटलं, आम्ही परत त्या तंबूत आलो, चहा बिस्कीट खाल्लं. रात्री झोप काही नाही आली. जरा कुशी वर वळलो तर गादी गार गुट्ट , दचकून जाग कशी बशी रात्र गेली. सकाळ अतिशय सुंदर निघाली. बाकी काही का असेना इथे सकाळ खूप सुंदर असते, हिमालय खूप मोहक आहे, एकदा सवय झाली ना इथली तर खूप आवडेल मला. हलका सूर्य दिसतो थोडे पांढरे डोंगर एका मागे एक असे अनेक डोंगर , आपण कसं हिरव्या झाडांचे अनेक हिरवे रंग बघतो तसं आहे ह्या डोंगराचं ... हरवून जातो आपण , पण ऊन हवं सकाळ हवी. 

इथे ना पंजाब दिल्ली वगैरे लोक खूप येतात त्या मुळे खूप ठिकाणी आम्हाला छोले पनीर मिळालं, पण इथे रात्रीचा बेत सुंदर होता, साधी मुगाची डाळ, दुधी ची भाजी आणि लाल भोपळ्याचा हलवा..पोळी भात होतच. त्याला म्हंटल अरे नवल आहे पहिल्यांदा छोले नसलेलं दिसलं मला. त्याच उत्तर फार छान होत, तो म्हणाला कि पाहाडो मे कहासे छोले आयेगा? इतक्या उंचीवर चांगलं नाही , जो जल्दी पकता है वोही जल्दी पचता है म्हणून साधं जेवण ... हि अक्कल बाकीच्यांना कधी येईल कुणास ठाऊक . सकाळी पण पोहे होते उकडलेलं अंड ... साधं होतं . 

आम्ही सकाळचं  खाऊन मनाली करता निघालो,  अंतर फार नाही तरी पाच एक तास खडतर प्रवास.. बाकी मनाली काय टुरिस्ट आहे सगळं,  गर्दी वैगेरे कमी.  विशेष म्हणजे इथे घटोतकोचा चं हिडिंबेचं देऊळ आहे, इथे राहायला तेव्हा अशीच लोकं लागत असणार तेव्हा. सगळं महाभारत इथेच घडलं म्हंटल्यावर काय हो. आम्ही हॉटेलात राहिलो थोडं फिरलो आणि मग चंदीगड आणि मुंबई .... 

आम्हाला इथे हॉटेलात जेवताना एक डोक्याला पट्टी असलेला साधा सुधा मुलगा शेजारच्या टेबल वर येऊन बसला , veg मे क्या है म्हंटला एकदम टिपिकल शहरातला गुजराती मुलगा. इथे कामाला आला असेल नोकरीला, पडला असेल आता  घाबरला असेल म्हणून सारखे फोन हॉस्पिटल air lines घरी असं  मला  वाटलं . 

माझ्या बॉस नि विचारलं काय लागलं? कुठचा तूच? तर पुढलं ऐकून आपण किती चुकीचे निष्कर्ष काढतो हे जाणवलं. तो गुगल मध्ये नोकरी करणारा तिशीतला amhmedabad चा मुलगा , स्पिती लोकल transport नि फिरत होता. (सगळं जे आम्ही आरामात इनोव्हा नि केलं ते) म्हणजे तो सगळीकडे लोकल transport नीच फिरतो म्हणाला, जिथे जिथे फिरला आहे ते सगळं . छन्द लग्न करण्यात रस नाहीये, घरून प्रेशर आहेच, पण छन्द. भारत भ्रमण .लोकल ट्रान्सपोर्ट, कारण लोकांशी बोलता येतं. तर हि जखम झाली मूद ला (आधी लिहिलं बघा, दिवसात एकच बस वगैरे ) , एका कुत्र्यानी उडी मारली ह्याच्यावर. हा पाइ कुठे जात होता तेव्हा, कुत्रा नाही चावला पण डोकं आपटलं --- टाके --- खूप रक्त , पण मूद ला एक बस २४ तासाने येते, डॉक्टर कुठें असणारे? मग लोंकांनी खूप मदत केली (हेच त्याला सिद्ध करायचं असेल , लोकं कशी मदत करतात) औषध लावलं पट्टी बांधली आणि एक टुरिस्ट जीप ने मनाली पर्यंत सोडलं . मग हॉस्पिटल MRI टाके सगळं ... केवढी धिटाई ... म्हणजे मला शेम्बळत वाटणारा कुणी जिगर भलताच जिगर बाज निघाला हो , आम्ही नुसतेच बोलण्यात शूर थंडीला घाबरणारे ... हि अशी तरुण मुलं भेटली ना कि मला खूप हुरूप येतो आशा वाढतात, देश पुढे चाललाय तरुण पिढी खूप धीट आणि जिगर बाज आहे हि खात्री होते ... खारीचा वाट म्हणून  माझ्या बॉस नीच त्याचं बिल भरलं आणि त्याला खूप आशीर्वाद कम गुड लक दिलेत .... 

आम्ही सुखरूप चंदिगढ आणि मग मुंबई ला आलो... 











Sunday, January 15, 2023

स्पिती - हिमाचल 5

 स्पिती - हिमाचल  ५

आमचा पुढचा टप्पा धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) , धनकर ला इथल्या (एकेकाळच्या)राजाचा महाल आहे एकदम डोंगरात दुर्गम भागात , म्हणजे इतक्या वर्षा पूर्वी माणसं इथे का आली असतील? आणि इथे का राहिली असतील हा मोठा प्रश्न आहे, इथे फार युद्ध वगैरे झाले असतील असं वाटत नाही (असली तरी कुणी इतिहासात ते मांडलं नाहीये ), इतक्या लांब येई पर्यंतच शत्रू दमून जाईल. पण एक नवल म्हणजे इतक्या उंचीवर कसं काय बांधलं असेल हे बघूनच जाणे. धनकर तलाव चा छोटा ट्रेक आहे इथे आणि ह्या ठिकाणी पण शाळा आहे ते मला फार आवडतं. मला शाळा दिसली कि आनंद होतो फार, अज्ञान दूर करण्या साठी दुसरी जागा नाही (whatsapp सोडून म्हणा ).   इथे TV आला आहे इंटरनेट आहे म्हणजे जे आपल्याला दिसतं ते ही लोकं सुद्धा बघतात. बदल होतोय हळू हळू ... हे सांगायला नको कि इथे पण monastery आहे. एक मला प्रश्न पडला इथे , हि लोकं आपल्या (बेकार) serials शी कसं relate करत असतील गाड्या , बंगला , दाग दागिने , झालंच तर छळ कपट भडक मेक अप , एवढी लोकं समुद्र वगैरे , उंच बिल्डिंगा ...  

धनकर जमिनी सपाटी पासून साधारण १२००० फूट वगैरे असेल आणि तिथे थोडं अजून वरती पाण्याने भरलेला तलाव आहे (कसं काय म्हणजे काय आहे हे, इथे वरती कोण भरतय पाणी ?? ).   आम्ही काही तो ट्रेक नाही केला पण खूप लोकं वर जाऊन येतात. इथे oxygen असं पण कमी आहे आणि वेळ तापता सूर्य (जितकं वर चढतो तितकं आपण सूर्या जवळ जाणार ना आपण). आम्ही सरळ गाडीत बसलो आणि पूढे पिन व्हिलेज मार्गे मूद गावा पर्यंत गेलो. 

मूद नावाचं गाव अतिशय दुर्गम आहे. इथे दिवसातून फक्त एकच बस येते (थंडीत तीही नाही ) संध्याकाळी ६च्या सुमारास आणि सकाळी सात ला निघते , एक बस सुटली कि थेट २४ तास थांबा ओला उबर सोडाच दुसरं कोणतंच वहान नाही, म्हणजे टुरिस्ट आहेतच पण बाकी काही नाही. इथून ना दोन मोठे ट्रेक्स आहेत पिन पार्बती आणि पिन बाबा पास , साधारण ८ ते १० दिवसांचा थोडा खडतर ट्रेक आहे ... म्हणजे माझ्या करता अशक्य ... दहा दिवस बर्फात आणि १५००० फुटांच्या वर (अंघोळ नाही काही नाही, परत whole वावर इस आवर म्हणजे जडच) काय काय कष्ट सहन करावे लागतील कुणास ठाऊक. मला जड आहे पण तुम्हाला हवं तर नक्की करा सगळा हिमालय तो. मी (लांबून का असेना) हिमालयाच्या प्रेमात आहे , अजस्त्र अति विशाल खूप गूढ कधी मोहक सुंदर कधी भीतीदायक ... आजवर इतक्या लोकांनी आपला जीव त्या हिमालयाच्या पायथ्याशी का गमावला हे सांगणं फार कठीण नाही. 

मूद मध्ये आम्हाला खूप फिरंगी दिसले, म्हणजे फिरंगीच दिसले ती लोक महिनोन महिने तिथे आहेत राहतात कारण तेव्हा नाही कळलं कारण असं गाव तर शंभर मीटर मध्ये संपतं (शाळा आहे बरं का ) मग का हि लोक इथे आहेत , रात्री लाईट पण गेली सकाळी पाणी पण थंड अंघोळ काय करणार (तिथे एक हनिमून कपल आलं होत, दया आली मला ... ). हि लोक इथे का ? इथे तर अफू गांजा पण नाही ... मग जेव्हा मुबंईत परत आलो तेव्हा शोधलं आणि कळलं कि इथे १८६० च्या आसपास एक शोध लागला, हिमालयाच्या दगडाचा rock formation. हि जागा geologists ना फार प्रिय आहे. काय काय सनशोधन करतात.    

आम्हाला इथे एक इटालियन माणूस भेटला तो कुठून तरी ट्रेक करून आला होता चार - सहा महिने इथेच असतो , भारत फार आवडतो म्हणाला , ज्या जागेवर आम्ही होतो तिथे नेटवर्क पण न्हवतं, मॅप्स काय चालणार? छापील घेऊन फिरतो म्हणाला, बत्तात्रेय केव्हाच गेली होती. एक दिवस गुहेत राहिला, आता इथून पण कुठे तरी जाणार म्हणाला. किती धीट असेल, काय कोरडं अन्न घेऊन फिरतोय तेच बाकी भाषा पण धड येत नाही आपली नवल आहे ह्या लोकांचं , उगाच जग भर राज्य नाही केलं ह्या युरोपियन नि.  

सकाळी थोडा नाश्ता करून आम्ही निघालो आणि  काझा ला साधारण ११ पर्यंत पोचलो . आमच्या हॉटेलच्या समोर ITBP चं स्थळ होतं त्यात बायका सुद्धा होत्या. ITBP म्हणजे Indo-Tibetian Border Police , खूप जोखमीच काम असणारे एक तर कायम थंडी किव्हा अति थंडी त्यात त्या चिनी लोकांशी सारखा सामना . आपल्याला इथे मुंबईत फक्त खड्डे किव्हा घाण किव्हा ट्रॅफिक फार तर थोडं राजकारण हेच विषय त्रास दायक ठरतात (पाऊस आपलाच आहे म्हणून त्याचा उल्लेख टाळला). पण ह्या लोकांचे challenges वेगळ्याच आहेत, हिमालया सारख्या मोठ्या पण त्यांना त्याचं काहीच नाहीये. 

काझाला तर फार म्हणजे फार उन्ह,  गरगर लच  , तो स्वेटर पण मी कम्बरेला बांधला (मग तो कुठे हरवला मग नन्तर परत जाऊन सापडला, मला ओळखणाऱ्या लोकांना ह्यात नवल वाटलं नसेल) आणि त्या मार्केट ला फिरलो.एक सांगायचं म्हणजे  काल्पा नन्तर थेट इथेच पेट्रोल पम्प लागतं अधे मध्ये नाहीच कुठे (वाहन मात्र खूप दिसली). तुम्हाला म्हंटलो ना सगळंच अजिब आहे. आम्ही तिथे हाटेलात थुपका खाल्लं मस्त, लोकल डिश. गम्मत म्हणजे मेनू मध्ये थालीपीठ पण होतं , हि लोकं खरी चांगली, आपल्या हाटेलात छोले पनीर चायनीज मिळतं पण थालीपीठ खायला पायपीट करावी लागते, इथे समोर थालीपीठ. आम्ही नाही खाल्लं म्हणा पण सांगतो आपलं. त्या मार्केट मध्ये मी दोन चार गोष्टी घेतल्या, लोकल माणसाला मदत (तो नेपाळी निघाला ) म्हणून. संध्याकाळी आम्ही ते जगातलं सगळ्यात उंचिवाल पोस्ट ऑफिस पाहिलं सगळ्यात उंच गाव उंच कार जाऊ शकते तो रस्ता   वगैरे वगैरे सगळं पाहिलं मग परत बुद्धा ची मूर्ती वगैरे वगैरे सगळं .  

काझाला मात्र मी फार दमलो रात्री नाक बंद झालं झोप नाही मला घराचे वेध लागले खरं तर , खरं तर हॉटेल छान होतं थंडी न्हवती जेवण उत्तम. सकाळ पाहतोय कि नाही असं झालं (पहिली एकदाची). उन्ह बाधलं मला फार , दुपारी तास भर पायपीट केली आणि नन्तर फिरलो पण .. डाइरेक्ट सूर्य प्रकाशाची सवय नाही मध्ये pollution नाही काही नाही निरभ्र आकाश ... पण झालो बाबा नीट . 

परत ते मोनास्टरी पाहून आम्ही चंद्रताल लेक ला गेलो .. चंद्रताल म्हणजे जिथून पांडव (धर्म राजच खरं तर ) डायरेक्ट स्वर्गात गेले ती जागा... 








Sunday, January 1, 2023

स्पिती - हिमाचल 4 - वाळवंट - Himalayan Desert

स्पिती - हिमाचल  ४ वाळवंट  Himalayan Desert 

आम्ही काल्पा सोडलं आणि स्पिती मध्ये शिरलो, आणि सगळं दृश्य बदललं , म्हणजे आधी सगळं छान होत, डोंगर डोंगर,  माथ्यावर छोटास बर्फ आणि  काल्पा सोडल्यावर एकदम रूक्ष डोंगर  सगळं वाळवंट , हा भाग सगळा वाळवंट , मला हि आश्चर्य वाटलं. म्हणजे डोंगराच्या एका बाजूला सफरचंदाने लडबडले वृक्ष एकीकडे एकदम वाळवंट? सारंच अजब आहे. हे सगळे डोंगर वेगवेगळे आहेत  रूप वेगळं, पण सारेच उंच  उंच अति उंच तेच एक काय ते कॉमन आहे. एखाद दिवस बरं वाटतं पण नंतर सगळं उदास भकास. हे सगळं थंडीत फार छान दिसतात म्हणतात कारण सगळं पांढरं शुभ्र दिसतं. पण त्या वाळवंटात सुद्धा मी एक सुंदर तलाव पहिला. नाको नावाचं गाव होत आणि तिथे एक सुंदर तलाव आणि बाजूला हिरवी झाडं होती . एक लोकल बुद्धिस्ट मंदिर होतं , थोडं चढायचं होतं तिकडे , वर कुणीही नाही .. म्हणजे इतक्या दुर्गम स्थानी कोण असणारे म्हणा, पण निरव शांतता, वारा होता फक्त, छान वाटलं. खाली येऊन आम्ही तलाव पहिला काय सुंदर तलाव स्वछ पाणी छान झाडी होती .. इतक्या वर तलाव  मस्त मस्त . शेजारी एका हॉटेलात जेवलो. एक माणूस आणि त्याचा परिवार होता बायको मुलं वैगेरे , एकदम हसरा छान जेवलो शाकाहारी होत, कढी बटाट्याची भाजी डाळ रोटी भात ... 

मला एक प्रश्न सारखा सतावतोय ... हि लोक आहेत तरी कोण? राहतात तरी कशी? सात आठ महिने बर्फ एरवी वाळवंट तरी आनंदी हसरी ह्या लोकांचं मिळकतीचं साधन तरी काय?  मिळकत नाही तरी हसरी माणसं का खूप काही मिळत नाही म्हणून जे मिळतंय त्यातच आनंद मानून हसरी असतात? पदोपदी हिमालय आपल्याला शिकवत असतो न बोलता आपण ते अनुभव करून शिकत जायचं असतं ... 

आम्ही पून्हा गाडीत बसून निघालो, एकूण आठ दिवस आम्ही सकाळ निघायचो आणि रात्रौ येऊन झोपायचो , कलपा ला काय ते आम्ही छान निवांत राहिलो. वाटेत असेच खडतर रस्ते काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरु आहे रस्ता अजून बरा करायचं BRO प्रयत्न करतंय , अफाट आणि फार मुश्किल आहे काम. इथेही काम करणारे बहुदा बिहारी आहेत आणि त्यात बायका खूप आहेत, टुरिस्ट गाड्या गेल्या कि ती कामगार लोकं आपल्याकडे बघतात आणि एकमेकात काहीतरी गम्मत सांगितल्या सारखी करतात आणि हसतात. नवल आहे, कष्ट करून घाम गाळून आनंदी,  किव्हा  कष्ट करून घाम गाळतात म्हणून आनंदी असतील. 

आमचा पुढला प्रवास गुये नावाच्या गावाला होता, थोडा आडवाटेला आहे ते आणि वाटेत एक नदी लागते. तर  त्या गुये चं महत्व असय कि तिथे एक ममी आहे (सगळंच अजब मी म्हणालो तुम्हाला). सांघा तेन्झीन असं त्या बुद्धिस्ट मॉंक च नाव आहे आणि ती साधारण ५०० वर्ष किव्हा जास्त जुनी आहे.  तो ध्यानस्थ स्तिथीत बसला आहे. कुणी म्हणतं समाधी घेतली कुणी म्हणतं कि ध्यान धरलं असताना भूकंप झाला असेल किव्हा बर्फ पडला असेल आणि बर्फात राहिल्या मुळे दात केस आणि स्किन पण तशीच राहिली. ITBP म्हणजे इंडिया तिबेट बॉर्डर पोलीस ह्यांनी १९७० च्या दशकात एका भूकंपा नन्तर सगळं ठीक ठाक करताना ,  ती दिसली मग त्यांनी ती एका मॉनेस्ट्री जवळ एका जागेत बसवली. गावकरांचं म्हणणं आहे कि ती ममी गावाला संकटातून वाचवते.  दात अजून शाबुत आहेत आणि नखं सुद्धा वाढतात असं लोक म्हणतात .  मग ती चीन ने तिथून नेण्याचा प्रयत्न केला वैगरे वगैरे गोष्टी आहेत . चीन म्हणजे तिबेट, अगदीच हाकेच्या अंतरावर आहे, तिथे नेटवर्क नाहीये फक्त लागला तर जिओ लागतो. पण एक फार आश्चर्याची गोष्ट म्हणजे नेटवर्क नसताना माझा मोबाईल बेजिंग ची वेळ दाखवू लागला. आणि ज्यांचा आय फोन आहे त्यांच्या बरोबरच झालं , अँड्रॉइड ला काही प्रॉब्लेम नाही आला. हि लोक बंद असलेल्या मोबाईल ची वेळ बदलू शकतात तर चालू मोबाईल च काय आणि कंप्युटर चं काय करतील सांगता येत नाही?

तिथे ती मोनास्टरी चं काही नूतनी करण सुरु आहे , त्यात एक माणूस बुद्धाची मूर्ती रंगवतना गात होता , आवाज थोडा घुमत पण होता, पण इतका अप्रतिम गात होता कि मी त्याची रंग कला सोडून त्याची गायन कलेंनीच प्रभावित झालो, त्याच्या कडून गाणं गाऊन घेतलं रेकॉर्ड हि केलं, लाजला बिचारा पॅन्ट पण फाटकी होती पण चेहरा प्रसन्न आणि आवाज पहाडी  देव कुठे कुठे पेरून ठेवतो कुणास ठाऊक ? मी  माझ्या इन्स्टा वर टाकलं  पण माझे  जेमेतेम ८० फॉलोवर्स  कुणी परत शेर केलं तर त्या माणसाचं आयुष्य बनेल पण आपण हिमालयात थोडी राहतो लोकांचा विचार करायला ?  

गाव छोटं टुमदार ५० ते ६० वस्ती तरी तिथे पोस्ट ऑफिस आहे बस येते, टाबो नावाच्या एका मोठ्या गावा पासून ४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सिमला पासून ४०० किलोमीटर... एक लक्षात घ्या तिथे थंडीत तापमान -२० च्या खाली जातं दिवसा सुद्धा -४ असतं आणि जवळचं गाव जिथे १२० घरं ... काय करत असतील इमरजन्सीत? का त्यांना इमरजन्सी नसतेच? का आपण बाऊ करतो? सगळंच अजब सगळंच खूप साधं सरळ . असं म्हणतात कि The most simple questions are the most profound. तू कोण आहेस त्यातलाच एक सवाल, हि लोक आहेत तरी कोण? 

आम्ही तिथून निघालो आणि टाबो नावाच्या गावी आलो. मला फार आवडलं ते गाव, चहुबाजूनी डोंगर (उंचच उंच खूप उंच) आणि थोडीशीच घर पण जवळ जवळ,  डिश अँटेनाहोत्या घरावर (म्हणजे हि लोक पण त्या अति भयंकर सिरिअल्स बघत असणार, काय रे देवा ), आमचं हॉटेल पण छान होतं. मी वर गच्चीत गेलो म्हणजे एक मजली बिल्डिंग वर ओपन असं टेरेस टाईप. समोर एक डोंगर होता तो ह्या बुद्धिस्ट मॉंक नि पोखरून त्यात गुहा केली होती आणि ती लोकं आत जाताना दिसले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लोक सरळ उतरलेत म्हणजे हातात काही दोरी नाही जवळ जवळ सरळ डोंगर पण वेडे वाकडे उतरत सरळ खाली येत होते. मला चार पावलं टाकलं कि धाप लागत होती आणि हि लोकं दररोज एवढा मोठा डोंगर वर खाली करत होते . हि मॉंक लोक ना दिसला डोंगर कि पोखरा आणि करा गुहा अशी आहेत , आमच्या बोरिवलीला पण कान्हेरी गुंफा आहेत, पण ते ठीके जंगल आहे जवळ समुद्र, नदी खायला प्यायला सगळं मिळत असणारे पण इथे हिमालयन वाळवंटात का म्हणून हि लोक राहत असतील आणि आता तरी आपण कपडे स्वेटर घालू शकतो पण त्या काळी असं काही नसणारे मग का बरं हे असं करत असतील? मी काय तिबेट नाही पाहिलं पण असच असू शकेल. इतक्या दुर्गम आणि कठीण जागेत का बरं वस्ती करायची ... (हल्ली लोक सिंहासनावर बसून ac हॉल मध्ये लोकांना ध्यान धरायला शिकवतात, चांगलंय) ... मी म्हंटल ना हिमालय खुप शिकवतो शिक्षक आपण निवडायचा . 

टाबो प्रसिद्ध आहे एका monastry साठी प्रसिद्ध आहे ती सर्वात जुनी आणि सगळ्यात पवित्र आहे असं म्हणतात. आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे फोटो काढले, लहान लहान लामा तिथे शिकत होते आणि फार कपडे न्हवते घातले. हि परंपरा अशीच पुढे नेण्या साठी धड्पड. त्या तिथे दुकानात मी चार गोष्टी घेतल्या माझ्या कडून त्या टाबो वासियांना मदत ... माणसं तिथे हसरी हो आणि हो एक शाळा सुद्धा होती तिथे.     


 
















 


 

Friday, December 16, 2022

स्पिती - हिमाचल 3

कल्पा 

आम्ही त्या चिटकूळ नावाच्या गावावरून निघालो आणि मग शांत पणे निसर्ग बघत बघत कल्पा नावाच्या एका सुंदर ठिकाणी गेलो. आणि रस्ते इतके छान इतके छान आणि ते पण इतक्या दुर्गम भागात कि कोण करतंय हा रस्ता? ह्या लोकांना मुंबईत का नाही बोलवत? तर मला असं कळलं कि रस्ता बनवणारे ना स्टेट गव्हर्मेंट ना केंद्र सरकार, रस्ता बनवतं BRO म्हणजे Border Roads Organisation. (ह्यांना एकदा मुंबईत आणलं पाहिजे, म्हणजे जिकडे ढग फुटी होते रस्ता वाहून जातो पण तुटत नाही, ते मुंबईच्या पावसाला काय घाबरतील?)

हा सगळा बॉर्डर एरिया , म्हणजे तिबेट ची बॉर्डर, म्हणून BRO बनवते आणि मेंटेन पण करते रस्ता. खूप डोंगराळ रस्ता, उंच उंच डोंगर , खूप थंडी आणि दुपारी एकदम गरम , पण तरीही त्यात पण कामगार काम करत होते , नवल वाटलं, आपण किती सुख सोयी बघून जागा बघतो आणि जरा वीज गेली इंटरनेट गेलं  कि कासावीस होतो . इथे रस्त्याच्या शेजारी थोडी सावली बघून काही कामगार निवांत पडले होते दुपारी जेऊन... म्हणून म्हणतो प्रवास करा , आयुष्य एक प्रवासच आहे. (माणूस पण ग्रेट आहे, तिथे इतक्या वरती पण धरण बांधतो, म्हणजे  रस्ता नाहीये पण धरण बांधतो आपण , अजब आहे आपला देश).  

आम्ही त्या कल्पा ला दुपारी पोचलो, हॉटेल पण छान होतं आणि आजूबाजूला झाडं कसली असतील? सफरचंद. मी कोकणात फिरणारा माणूस आहे, त्या मुळे आंब्याची कलमं बघायची सवय आणि इथे तर तगरी च झाड असतं ना? तशी सफरचंद लागली होती लदबदली होती . मी विचारलं कि खाऊ का एक तोडून ? अरविंद म्हणाला कि कच्ची आहेत अजून वेळ आहे तयार व्हायला, मी देईन पुढे गेलो कि, खूप ओळखीचे आहेत. 

त्या पर्वत शिखराचं नाव किन्नर कैलाश , कारण त्या अनेक उंच उंच डोंगरान मध्ये एका डोंगरावर शंकराच्या पिंडीचा आकार आहे आणि तो डोंगर अति विशाल आहे, सगळंच अजब आहे. 

ह्या  जिल्ह्याचं नाव किन्नौर असं आहे म्हणून त्याला किन्नौर कैलाश असं खरं तर म्हणतात, इथे भगवान शंकर आणि देवी पार्वती राहतात अशी समजूत आहे म्हणून त्याला कैलाश हे नाव . १४ किलोमीटर चा ट्रेक आहे आणि ती पिंड जवळ पास ७० एक फूट उंच आहे. दुर्बीण असली असती तर नीट पाहता आलं असतं , इतका ट्रेक करायला तुम्ही एकदम प्रोफेशनल असायला हवेत आम्ही ज्या वेळी गेलो होतो सप्टेंबर तोच चांगला महिना आहे ट्रेक साठी, साधारण सहा हजार पन्नास मीटर इतका उंच आहे तो पर्वत आणि तिथे पार्वती नि पाण्यासाठी कुंड सुद्धा केलं आहे म्हणतात. म्हणजे बघा ६०५० मीटर वर एक पाण्याचा कुंड सुद्धा आहे. इथे आपल्या नाळात, तिथे इतक्या वर पाणी. श देवानेच केला असणार, माणसाचं कामच नाही ते.  

पण इतक्या खडतर ठिकाणी शंकरच राहू जाणे (म्हणुन गणपती बाप्पा, आपला महाराष्ट्रात जास्त वास्तव करतो ), तिथे शन्कराचं खूप कौतुक आहे, असणारच हो . एकदम डॅशिंग असणार मी दोन मिंट डोळे मिंटून साष्टांग घातला. 

पण सांगतो तुम्हाला इतकं सुंदर दिसतं ना ते दृश्य खालून सुद्धा कि अगदी अद्भुत अचंबित करणारं होतं. आपण नतमस्तक होऊन त्या निसर्गा पुढे त्या भगवाना पुढे आपसूक हात जोडतो. (जा एकदा मला थँक्स म्हणाल). आपण किती शुल्लक आहोत ते पदो पदो तो निसर्ग आपल्याला ठासून सांगत असतो, चुकून एक धोंडा जरी निखळला ना वरून तर सगळंच गाव बेचिराख होईल, का उगा आपण मी माझं मला माझंच करतो ? तुम्हारा एक नाही चलेगा बंधू . 

पाय निघत न्हवता माझा,  कारण आमच्या खोली बाहेर एक बालकनी होती त्यातून हेच दृश्य. तरी आदल्या संध्याकाळी आम्ही थोडी चक्कर मारली एक बंद देऊळ बघितलं, इथे देवळं कायम उघडी नसतात सकाळी असतात फक्त. पण ते पाहायला पण ५० मजले चढ उतार केल्या सारखं वाटत होतं. तिथे पण एक शाळा होती मुलींची आणि शेजारी हॉस्टेल कारण मला वाटतं हे थोडं मोठं गाव आहे, बाकी सगळी आजू बाजूला खेडी... इथून पण जवळचं स्टेशन शिमला बस नि आठ दहा तास (काय न्हाय निवांत जावा) आपण चायला उगाच घाई घाई आणि emergency मध्ये काय होईल असं म्हणतो. ह्या लोकांचं काय अडलं आहे का? नाही ना?   

आमचा ड्राइव्हर अरविंद तिथेच राहतो जवळ पास त्याला एक दिवस घरी जात आलं , तो म्हणाला कि लहानपणी शाळेत जायला रोज १० किलोमीटर येऊन जाऊन अशी तंगड तोड होती, पण लक्षात नाही यायचं म्हणाला , मजेत मस्ती करत जायचो (मुद्दाम म्हणाला असेल माझी दमछाक पाहून). हि लोक पण जाम काटक , मला वाटतं हा सहज धावेल मॅरेथॉन. सगळ्या उंच ठिकाणी असतं तसंच एक suicide point इथे पण होता. पण तिथे जवळ गेल्यावर समजलं कि खाली उडी मारायची गरजच नाही, नुसतं खाली वाकून पाहिलं तरी हार्ट अटॅक येईल इतकं खोल , तळ दिसतच नाही, (म्हणजे जीव द्यायला पण डबा घेऊन जावं लागत असणार, खाली पोचे पर्यंत माणूस उपास मारीने मारायचा ) एक तर मला उंचीची प्रचंड भीती आहे आणि हे तर उंचीच्या पलीकडलं. मगाशी सांगितलं ना? कि तो कैलास परबत ६ किलोमीटर उंच  आणि हि जागा इतकी उंच कि खाली तळ दिसत नाही म्हणजे खालून किती उंच असेल तो पर्वत? आणि खाली गेलो तरी शिमला ते पण इतक्या उंचावर .... तुमहाला लक्षात येतंय का? मी मगास पासून उंच उंच उंच करत होतो ते किती उंच आहे ते? आकाश पर्यंत उंच आहे हे सगळं .... 

इथे पण रस्ते छोटे होते पण चांगले होते, आमचा पुढचं पेट्रोल पंप दोन दिवसाने लागणार होतं ... नाही म्हणजे जस्ट सांगितलं ..... इथून पुढे सगळं वाळवंट लागणार होतं ... 

 









 

 


 

 

Sunday, December 11, 2022

स्पिती - हिमाचल 2

आधी सांगीतल्या प्रमाणे आम्ही तो डेंजर रस्ता चढून वर आलो (पुढला प्रवास बहुतेक अश्याच रस्त्यात होणार होता ) तर मधेच एक गाव लागला चिटुकलं पण हे चिटकूल न्हवत कारण  चिटकूल  अजिबात चिटकू पिटकू नाहीये. ह्या चिटकूल च एक वैशिष्ठ म्हणजे तिबेट च्या आधीचं हे शेवटचं गाव आणि शेवटचं पोस्ट हाफिस. इथे हिमाचल खुपसा भाग तिबेट च्या बॉर्डरला आहे त्या मुले भारतीय सैन्य आणि BSF ची खूप सैनिक दिसतात. म्हणजे आम्ही त्या चिंचोळ्या रस्त्याने वर येताना समोरून अनके ट्र्क आले मग आम्ही गाडी रिव्हर्स घेऊन कडेला उभं राहून त्यांना जागा करून दिली. हे गाडी  रिव्हर्स घेऊन कडेला उभं इतकं सोपं नसतं (आमच्या लहान पणी बिल्डिंग ला भिंत असायची आणि मग आम्ही एका बिल्डिंग मधून दुसया बिल्डिंग ला जाताना भिंत चढून जायचो, साधं सरळ गेट मधून नाहीच आणि बरेचदा शॉट कट म्हणून जायचो, तर त्या भिंतीवरून आम्ही चालायचो, एक वीट भर भिंत त्या वर जेमतेम एक पाऊल राहील असं, पण समोरून कुणी आलं कि मग ज्या कवायती कराव्या लागायच्या  तशी कवायत  हि लोक मोठ्या गाड्या घेऊन करतात) हे उधाण मुलांना नक्की कळेल 

मी इतकं लहान पणीचं  उद्धरण दिलं . कारण असय ना,  तिथे गेलं कि आपो आप आपण कॅलेंडर मागे नेतो कारण ती लोकं अजून जुन्या सारखंच आयुष्य जगतात , उगाच हसतात (?) आनंदी असतात,  प्रामाणिक म्हणजे प्रामाणिक , प्रामाणिक एकदमच प्रामाणिक 

उदहारण .... 

आम्ही गाडी लावली एका टेकडीवर आणि उतरून दऱ्या पाहायला जात होतो आणि मला आठवलं माझं पाकीट असलेला बटवा का बॅग तिथेच गाडीतहोती , मी म्हंटल जरा गाडी उघड किमान पाकीट तरी घेतो, तर ड्राइव्हर म्हणाला कि खूप पैसे जरी तू गाडीत ठेवलेस आणि गाडी उघडी ठेवलीस तरी सुद्धा कुणी आत अजिबात पैसे घेणार नाही हि लोक संतुष्ट आहेत.  (कारण त्यांच्या कडे खूप मौल्यवान असा फक्त निसर्ग आहे आणि अजून तरी आपल्यात तो निसर्ग हिरावून घ्यायची क्षमता नाहीये, अजून तरी ) हे मी मनात म्हणालो. थोडं विषयांतर होतंय पण  ना लाज वाटते आपलीच. असो .. इथे क्राईम रेट सगळ्यात कमी (कमी नसायला काय? इथे बुटाची लेस लावताना धाप लागते चोर धावणार कसा? अन कुठे?)

तर वर जाताना एक पठार लागला म्हणजे गावं लकछम  होतं नावं गावाचं  ते  लागलं.   तिथे शेती करतात लोक, फूल दिसतात पण त्याला म्हणतात उगला म्हणजे आपला गहू (आपले तांदूळ खरं तर), पण हे दळून ह्याचा दीरढ करतात म्हणजे मराठीत डोसा.   तिथून खूप वर गेल्यावर बसपा नदी च्या किनारी आमचे टेन्ट्स होत्या . काही गोष्टींचं वर्णन करायला शब्द तीठे पडतात (एक तर माझा शब्द  भांडार सीमित आणि हा निसर्ग अफाट अद्भुत , ह्याला शब्दात का आणि कशाला बांधायचं.  (सगळंच का बांधायचं? काहीही का बांधायचं). भारतात का जगात माहित नाही पण इथली हवा सगळ्यात शुद्ध आहे असं रिसर्च मधून समजलं https://www.sagarkulkarni.in/ इथे मी थोडेसे फोटो टाकले आहेत, जमलं तुम्हाला तर शब्दात बांधायचा प्रयत्न करा , माझ्या कुवतीच्या पलीकडलं आहे . 

हा कॅम्प ना बास्पा नदीच्या किनारी आहे (आठ महिने बंद) आणि   काय  तो निसर्ग अनेक अनेक डोंगर डोंगरा मागून डोंगर आणि मध्येच एका डोंगराच्या शिखरा वर मुकुटा सारखा बर्फ  अद्वितीय काय निसर्ग काय ते दृश्य पाषाणा ला पाझर फुटेल ... हि ,माणसं इतकी निरागस साधी का ? ते मला समजलं रोज उठून तुम्हाला हे दृश्य दिसलं तर ? परत झोपताना आकाश हळू हळू रंग बदलतं हवा आणिक थंड,  माहोल सर्द होतो  आणि इतकं सगळं सुंदर असतं कि तोच मोठा नशा होतो .. अहाहाहाहा.  

खरं सांगतो त्या टेन्ट मध्ये रात्री आपण गारठतो , सगळं शांत आणि नदीचा हलका आवाज ... मला पाण्याचं व्यसन आहे आणि नद्यांच्या पाण्याचं अधिक, मालवण ला मी नदी किनारी राहायला पसंद करतो, पण पाणी.  मला पाणी खूप आवडतं आणि इथे तर मी जेम ते, वीस ते तीस फूट पाण्याच्या जवळ होतो, पाण्यात पाय ठेवला तरी गारठतो, पण नितळ, शुद्ध पाणी पाहण्यात वेगळी मौज असते .. हा मंद आवाज ऐकताना कधी झोप लागली ते समजलं नाही आणि सकाळी बाहेर पडलो तेव्हा अद्भुत ... 

तिथे जी मुलं होती त्या टेन्ट ची काळजी घेणारी ती उशिरा उठली मग आम्हीच चार लोकांनी मिळून चहा केला , सडे आठ नऊ ला चहा नाश्ता मिळाला पण चहा तर सकाळीच लागतो ना? अमृतुल्य आहे इतक्या सुंदर ठिकाणी चहा नको? बाकी मी काय वर्णन करू? सुंदर नदी , डोंगर. मधेच एखादा पंधरा शुभ्र कलशा सारखा एखादा डोंगर माथा. आमच्या अवती भवती फिरणारा तो गोंडस कुत्रा ... (एक जाणवलं जिथे माणूस तिथे कुत्रा अख्या देव भूमीत म्हणाल तिथे असाल तिथे एखाद दिसतच. ). जाऊन या,  रमणीय आणि प्रेक्षणीय आहे. 

चिटकूळ ला एक शाळा आहे (हो हो आहे ). मला दोन लहान मूल दिसली, (तुम्हाला सांगतो शाळेत जाणारी मूळ आणि मुली ह्या पेक्षा दुसरं प्रेक्षणीय दृश्य नाही ) एक मेकांच्या हातावर काही तरी काढत होती, चारच महिने शाळा किती मस्त पण बाकी सगळा बर्फ , माझ्या समजण्या पलीकडलं आहे . असो , तर ह्यांच्या कडे धन्य कोठार आहेत, आठ महिन्याची शिदोरी असते ह्यात, आमचा ड्राइवर अरविंद म्हणाला कि ह्यांच्या कडे किमान डेड वर्ष पुरेल इतकं धान्य असत, पैसा अडका नसेल पण , धान्य आणि पाणी असतं पाणी म्हणजे सगळाच बर्फ. किती बेसिक धरून आहेत हि लोकं .. ना?  बकरा कापून तो उन्हात सुकवतात , उन्ह खूप तीक्ष्ण असतं (अगदी सूर्या च्या जवळ न हो?) मग बकरा चांगला सुकतो मग तो खायचा हिवाळ्यात , खाली खूप डेलिकेसि म्हणून खपते... इथे मिनरल वॉटर फुकट  डायरेक्ट हिमालयातून हो, परत २००० हजाराची डेलिकेसि रोज ताटात , हवाय कशाला हो वैभव?


एक देऊळ आहहे तिथे सुंदर नक्षी काम केललं पण लाकडी कारण बर्फात काही नाही टिकणार, फोटो मध्ये पहा कित्ती सुंदर आहे, सकाळी एक तास भर असत उघडं बाकी बंद. तिथे एक आंधळा माणूस आणि त्याची बायको आले होते देवाच्या पाया पडायला, आम्ही त्यांना झुले असं केलं (म्हणजे नमस्कार असेल ). पण सांगयचं असं कि ती दोघे इतके हसरे होते, देवाच्या पाया पडले आणि  गेले, म्हणेज आंधळा माणूस तसं पाहिलं तर दारिद्य आठ महिने बर्फ बर्फ अगदी -२१ वगैरे असेल पण जोडपं हसरं ... माझे वडील म्हणतात तसं और क्या चाहिये :) . सुख आपल्या मानण्यावर आहे ... 


शब्द खूप दगा द्यायला लागलेत ... 


जाऊन या , पुढे काल्पा आणि बाकीची स्पिती फिरवतो .... 















Thursday, December 8, 2022

स्पिती - हिमाचल 1

मी खूप ते डिलिव्हरी ऍप्स वापरतो , दहा मिनटात घरात सामान हजर , आधी लोकं घरात धान्य साठून ठेवायचे आता सगळं हवं तेव्हा. बर तो माणूस जर दहा ऐवजी वीस मिनिटाने आला कि मी दहा वेळा फोन करून ... किधर है? किधर है ? असं विचारतो .... "मी" , आपलं एक प्रतीकात्मक म्हणून वापरलं ... आपण मुंबईत किव्हा मोठ्या शहरात अगदी इन्स्टंट जगतो आयुष्य , अगदी आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता , झोपायच्या आधी आणि उठल्या उठल्या मोबाईल बघतो ... 

 मला हिमालयात जा शांत होशील ... असा सल्ला दिला कुणीतरी.  आणि काहीही प्लॅन नसताना मला स्पिती ला जायची संधी मिळाली .... तिथे खूप ठिकाणी मोबाईल तर सोडाच साधा वाणी नाहीये बस सुद्धा दिवसातून एकदाच आणि ती नाही येऊ शकली तर दोन दिवस काही सम्पर्क नाही...  रस्ताहि धड नाहीये ... 

दोघातला विरोधाभास पाहिलात ? 

ignorance is bliss म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे , मला स्पिती बद्दल काही माहित न्हवतं आणि मी शोधायचा प्रयत्न पण नाही केला,  एक तर मी आळशी आहे, दुसरं म्हणजे मला कधी कधी माहित नसताना गेलेलं आवडतं, म्हणजे बघा तुम्ही एखाद्या ठिकाणचं गुगल करून फोटो पाहता माहिती काढता यू ट्युब बघता आणि जाता, पण तिकडे असं वेगळंच दिसतं मग नर्व्हस होता, त्या पेक्षा जे दिसेल ते .. अरे वाह ओह हो असं करत जावं, तेवढीच मज्जा आणि तिसरं कारण म्हणजे मी ज्यांच्या बरोबर जाणार ते म्हणजे माझे बॉस होते (आलं लक्षात मी आगाऊ पणा का नाही केला ते ?) आणि ते स्वतः एक दोन खेपेस तिथे फिरून आले होते आणि दर ३ महिन्याने कुठे कुठे जात असतात त्या मुळे मी तसा सेफ हॅन्ड्स मध्ये होतो मग पुन्हा का कष्ट घ्या?


वर सांगितल्या [प्रमाणे कार्यक्रम अगदी उत्तम प्लॅन होता आणि कुठेही त्रास झाला नाही कि,  अरे येऊ करायचं राहीलच ते ठरवलं असतं तर सगळं व्यवस्थित. खरं तर मी तसा फार जास्त प्लॅन वाला माणूस नाहीये आणि माझ्या बकेट लिस्ट मध्ये नजीकच्या काळात  भूतान आणि कधीतरी नन्तर न्यू झीलण्ड होतं (म्हणजे अजून आहेच ) आणि मला अचानक हा प्रस्थाव आला आणि मी लगेच त्याला होकार दिला. पण गम्मत म्हणजे इथे मला जरा भूतान चा फील आला कारण हे तिबेट ची बॉर्डर आणि एकूण लोकं सगळी बुद्धिस्ट आणि दिसायला थोडी तशीच (पण तरी भूतानला मी जाणारच). 

स्पिती,  लोकं थन्डित म्हणजे बर्फात करतात किव्हा उन्हाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर आम्ही तस केलं. साधारण एक आठ दिवसात आम्ही मुंबई - चंडगढ -नरकांडा (मुक्काम) - चिटकूळ (मुक्काम) -कल्पा (मुक्काम) -नाको -गुये - ताबो (मुक्काम) -धनकर -पिन व्हिलेज - मूद व्हिलेज (मुक्काम) -कोमिक -हिक्कीम -लान्गझा -काझा (मुक्काम) -कि -चेचम -चंद्रताल (मुक्काम) - मनाली (मुक्काम) ते चंदिगढ -मुंबई .... इतकी पायपीट केली (इंनोवा मधून). 

मी समुद्र सपाटी वरचा माणूस आणि माझं निम्म्या हुन अधीक आयुष्य तळ मजल्यावर गेलं, फार तर रायगड सर केलाय , पण इथे रायगड पेक्षा सहा पट उंच डोंगर (सहा पट हे का म्हंटलं ते चतुर लोकांना समजलं असेलच)आणि तो पाहून टोपी पडली कि मागे आणिक एक उंच डोंगर , (इथूनच पांडवांनी स्वर्गात जायचं नियोजन का केलं हे मला कळलं ) म्हणजे उंचच  ऊंचं. परत आता झालंय कसं कि आपल्याला ऑक्सिजन लेवल वगैरे असते हे कोविड  नि शिकवलंय त्या मुळे पंचाईत होते तिथे ऑक्सिजन लेवल ७५ वगैरे होते म्हणे . म्हणजे मी बुटाची लेस बांधायला वाकलो आणि धाप लागली, फाटली ना हो. एरवी मी धावतो माझा stamina बराय हा गुरुर त्या डोंगराने (त्याच्या) बुटा खाली तुडवला (म्हणून डोंगराशी मस्ती नाही).  

नारकाण्डा ला आम्ही चंदिगढ हुन शिमला मार्गे साधारण ५ च्या सुमारास पोहोचलो अंतर फार नसलं तरी खूप घाट रस्ता खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच , गाडी लागणारा माणूस असेल तर त्याला अशक्य आहे (तिथे राहून गाडी लागते असं म्हणणारा माणूस अशक्य). आणि थंडी पण बरीच होती म्हणजे दोन दोन स्वेटर , तरी हा उन्हाळा म्हणून बरं एरवी बर्फा खाली असतं सगळं. इथे मला वाटतं निम्याहून अधिक हिमाचल हे आठ महिने बर्फ़ा मुळे बाकीच्या निम्म्या राज्या पासून तुटलेलं असतं. रस्ता नसतोच सगळं बर्फ़ा खाली जाणार कसं?

हिमाचल ला देव भूमी म्हणतात, का ते तिथे गेल्यावर कळतं. आहो सगळंच इतकं अफाट आणि निसरगावर अवलंबून असतं कि माणूस अगदीच थिटा वाटतो. पण अफाट हे सुंदर असू शकतं हे हेचि देही हेचि डोळा पाहून पटतं. आम्ही जेव्हा  नारकाण्डा ते चिटकल हा प्रवास केला तेव्हा मध्ये मोठी गावं तालुके आणि काही ठिकाणी तर मध्येच घरं बांधली असं वाटलं, आमचा ड्राइवर (जो स्वतः  दोन बस आणि ३ गाड्यांचा मालक आणि एकदम हिरो टाईप्स होता) म्हणाला,  कि आत डोंगरात अजून घरं आहेत , म्हणजे आपल्याला कळत सुद्धा नाही कि गावं असतील म्हणून इतक्या आत दरीत. मध्ये रामपूर नावाचं मोठं गाव लागलं, तालुका आहे म्हणून कळलं . पण एकदम छान होत, कुठे दारिद्य नाही दिसलं, जवळचं  स्टेशन म्हणजे शिमला ते हो १४ तास , बाकी सगळं बस , त्या शिवाय पर्याय नाही. इतकं चार लोकांन पासून दूर आहे म्हणून मला वाटतं ते छान आहे . 

आम्ही इतक्या उंच गेलो तेव्हा तिथे सपाट पठार लागलं आणि इतकं सपाट कि तिथे शेती करतात लोक , इथे ना सगळी कडे डोंगर  आहेत म्हणजे बघा हा कि आपण समुद्रात जातोय अथांग समुद्र आणि मध्येच एखादं बेत लागलं छोटं तर लोक तिथे राहायला लागतील तसं काहीसं .... नुसते उंच डोंगर तो चढून गेलात कि पुन्हा नवीन मोठा डोंगर आणि त्या मध्ये एक छोटं खानी प्लेन जमीन , मग लोकांनी काय केलं कि थोडी सपाट जमीन दिसेल तिथे घर बांधली आणि मग आणिक लोकं येऊन त्यांनी गाव केलं आणि मग असं सगळं राज्यच बनलं. आम्हाला वाटेत बरेचदा बकरी, म्हणजे मेंढ्या (लोकर असते ती कोण हो? त्याच ) चारणारे लागले , आमचा ड्राइवर म्हणाला कि हेच खरे तर Original explorer अश्या मेंढ्या गाई म्हशी घेऊन फिरायचं छानशी जाग लागली कि तिथेच थांबून घर करायचं मग शेती वैगेरे करायची, जागा भरली कि पुढे जायचं आणि दुसरं गाव ... काय काय नवीन शिकायला मिळतं.  

चिटकुल चा वर चढताना रस्ता थोडा खराब आहे आणि काही ठिकाणी तर एकच गाडी जाऊ शकते.  सामोरा समोर गाड्या आल्या तर एक गाडी कड्याच्या जितकं कडेला म्हणून जाता येईल, तितकं जाऊन ती थांबते,  पूर्वीच्या काळी कडेलोट कश्याला म्हणत असतील त्याचा अनुभव घेतला आणि मला पुढे पुढे गेल्यावर असं कळलं कि हा रस्ता सगळ्यात OK आहे आगे आगे देखो असं म्हंटला ड्राइवर . 

सहा आठ महिने हा रस्ता बंद असतो म्हणजे वरची लोक वरतीच राहतात. बंद का असतो तर सगळा बर्फ, रस्ता करणार कधी आणि कसा? 

वरची गम्मत मी खाली म्हणजे पुढच्या भागात  सांगतो. 




Wednesday, June 5, 2019

आनंदवन

मानव निर्मित खूप मोठं खूप प्रचंड बघण्याचा पहिला अनुभव मला आयफेल tower बघितला तेव्हा आला , म्हणजे माणूस इतका अफाट इतका मोठा विचार करू शकतो ? दुसरा अनुभव बाबा आमटे ह्यांच्या आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्पांना भेट दिली तेव्हा आला . म्हणजे साधारण माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडील आहे सगळं .  दोघान मधला एक मोठा फरक म्हणजे, एक कृत्रिम आहे आणि त्याचा आकार तेवढाच राहील आणि दुसरा माणसांनी जोडलेला बांधलेला आणि वाढतच जाणारा अविरत ... 

नुसतं पाहिलं कि  भारावून जातो आणि मग तिथली माणसं आपल्याला काही माहिती देतात फिरवून आणतात तेव्हा तर बाबा आमटे ह्या उत्तुंग माणसाच्या कामाचं खर स्वरूप दिसत, कळत . तिथली सगळीच माणस  इतकी शांत आणि प्रेमळ आहेत तस पाहायला गेल तर हल्ली रोज  एक ग्रुप तिथे येतो, पण सगळीकडे त्या कार्यकर्त्यांनी त्याच जोमाने अनु उत्साहाने सगळं सांगितलं आणि अस ते अनेक वर्ष करत आहेत  आणि करत राहतील . employee satisfaction वगैरे म्हणेज हेच असेल. 

आनंदवन :  मला आनंदवन नक्की कुठे आहे हे ठाऊकच न्हवत, आमटे कुटुंबा, बद्दल आनंदवन बद्दल तस  खूप माहिती होत पण आहे कुठे? नागपूर जवळ हे एवढच , मग जंगलात आहे का?आजूबाजूला काही असेल का? वगैरे सगळे स्वप्न रंजीत संकल्पना मी डोक्यात बांधल्या , नेट वर शोधल तेव्हा असं लक्षात आलं कि गाईडेड टूर्स असतात , इथून नागपूर मग तिथून त्यांची गाडी दोन तासावर आनंदवन मग तिथून हेमलकसा आणि सोमनाथ मग परत नागपूर. पण मला हे टुरिस्ट सारखं करायच न्हवत म्हणून चार लोकांना चार वेळा (दिवसातून ) फोन करून माझा मी आलो .  तर आनंदवन च्या सगळ्यात जवळच स्टेशन म्हणजे वरोरा इथे तुम्ही नागपूर हून बस ने किव्हा गाडी करून येऊ शकता . म्हणजे नागपूर ला दुरोन्तो ने उतरून मग तिथून गाडी करून पुढे, किव्हा सेवाग्राम ने थेट वरोरा ला  उतरून येऊ शकता फार तर एक किलोमीटर अंतर असेल वरोरा पासून  . फक्त सेवाग्राम दुपारी ३ ला सुटते आणि दुरोन्तो रात्री ८. सेवाग्राम खूप ग्रामांची सेवा करते त्या मुळे रटाळ होत, पण नागपूर ते वरोरा चा खर्च वाचतो.  आनंदवनात राहायची सोय झाली नाही तर दोन चार हॉटेल्स ही आहेत जवळ पास.

बुधवारी आनंदवन बंद असतं म्हणजे वरोरा बंद, त्या मुळे आतले सगळे उद्योग बंद असतात .... काय काय उद्योग करतात ते आम्हाला आत फिरल्यावर समजलं . खूप मोठा परिसर आहे, सगळं स्वच्छ , झाड लोट करताना माणसं सुद्धा फार दिसत नाहीत पण शिस्त आणि स्वच्छता अंगवळणी पडलं आहे इथल्या रहिवाश्यांच्या. साधारण लोकांची कल्पना अशी असते कि आनंदवन म्हणजे सगळे कुष्ठरोगी इथे तिथे फिरत असतील , तर असं अजिबात नाहीये, ज्यांना ट्रीटमेंट ची गरज आहे ती दवाखान्यात असतात त्यांच्या कुटुंबाला राहायची सोय आहे . बरेचदा नातेवाईकांनी म्हणजे अगदीच सख्यांनी टाकलं असत , ते बरे होई पर्यंत इथेच असतात आणि नंतर इथेच काम सुद्धा करतात . बरे झालेले  रुग्ण अगदी ताठ मानेने इथे फिरत असतात . आपल्या संकल्पना सगळ्या उधळवून लावत ती लोक आपल्या डोळ्यात डोळे घालून नमस्कार करतात, हसतात , बाहेरच्या जगात ही लोक अगदीच दिन वगैर दिसतात पण आनंदवनात खूप वेगळं चित्र आहे , इतका सम्मान मिळालेला दिसतो कि खरंच अस वाटतं कि आपण एका माणसाला जरी पायावर उभं करू शकलो तरी किती केलं असं होईल, इथे तर शेकडो माणस  आपल्या पायावर पुन्हा उभी झाली , पडलेल्या माणसाला उभ करणं खूप कठीण, इथे तर पिढ्याच्या पिढ्या परत उभ्या केल्या आहेत.

बाहेरच्या लोकांची जेवायची उत्तम सोया आहे आणि एक म्हणजे आपणच आपलं ताट वाट्या धून लागतात, कुणी  मोठं नाही कि लहान नाही सगळे सेम. सगळ्यांना एक चक्कर मारून आणली आनंदवनाची, नाव सार्थक करणारी लोक तिथे आहेत, सगळेच आनंदी दिसतात किव्हा आपण ज्याला इंग्रजीत "content" तशी आहेत लोक, आपल्या मुंबईत सगळी लोक ट्राफिक मुळे , गाडीतल्या गर्दी मुळे म्हणा, एकूणच फार कवलेली दिसतात, पण इथे सगळी लोक आनंदीच  दिसतात.

गुरुवारी आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा तिथे एक फिल्म दाखवत होते, म्हणजे जनरल असं, माहितीपट. ती फिल्म बघून बाहेर आलो आणि बाजूला असलेल्या ग्राम उद्योगाच्या दालनात शिरलो. सगळं काम हाताने केलेलं, ग्रीटिंग कार्ड्स होते चित्र होती. दुसरी कडे गेलो तर तिथे कोरीव काम केलेल्या वस्तू होत्या. जुन्या टाकाऊ वस्तूं पासून सुद्धा किती गोष्टी केल्या होत्या. काय कलाकारी, आपण थक्क होतो. तिथे पु लंनी (पु ल देशपांडे) लावलेले एक झाड आहे , आता वटवृक्ष झालाय म्हणा (होणारच, त्यांनी हात लावलेलं प्रत्येक पण फुलतंच), आणि  विकास आमटे म्हणाले कि पु ल न चुकता दर वर्षी येऊन जायचे, म्हणजे त्यांना झेपत होत तो पर्यंत, शेवटची चार पाच वर्ष सोडून आणि मदतीचा हात कायम पुढे, तरी पु लंच्या एकाही लिखाणात त्यांच्या मदतीचा उल्लेख आहे का? देणार्याने देत राहावे .... त्या दोघा दोस्तांचे फोटो आहेत खूप, मी साष्टांग नमस्कार घालणार होतो, पण मोह टाळला.  इतकी मोठी माणसं आपल्याच राज्यात असल्याचा अभिमान वाटला, नकळत छाती फुगली आणि डोळे आपोप भरून आले...दिपलेच म्हणा.   बाबांना माणूस म्हणायचं कारण म्हणजे ते देव, दैवत ह्या पासून दूर राहिले, कोणत्या माणसाला जात बघून ट्रीटमेंट नसते इथे, आणि बर झाल्यावर धर्माच बंधन नाही. इथे धर्मशाळा आहे का? अस कुणीतरी विचारलं तेव्हा विकास आमटे म्हणाले कि इथे धर्मच नाही धर्म शाळा कशी असणार? इथे या आणि राहा, मदत करा ... आनंदवन हेमलकसा, सोमनाथ, कुठेहि देऊळ नाही कि देव नाही ... देव पणा सुद्धा नाही.. आपण देव शोधतो माणूस शोधायला हवा ..  लगेच सापडेल.

पुढे मग हातमागाचे काम चालू होती. सतरंज्या चादरी, गालिचे, सगळंच. तिथे पाठीच बाबा आमटे आणि साधना ताई ह्यांची समाधी आहे, छान झाड आहेत. मला जाळताना झाड नका कापू म्हणाले, काय बोलायचं? आणि साधना ताईंची समाधी तिथेच शेजारी. पाठी राखीण म्हणजे काय? ह्याचा उत्तम उधाहरण हि सगळीच आमटे फॅमिली, म्हणजे इतक्या उत्तुंग माणसाला जपणं त्यांच्या कार्यात बरोबरीने आणि काही वेळा जास्त सहभाग देणं हि खूप कठीण गोष्ट असते, एखाद्या माणसाला एका गोष्टीचा ध्यास लागतो, पण त्यांच्या साथीदाराने फक्त त्या माणसाचा ध्यास असून वाट्टेल ते पणाला लाऊन  नवराच्या यशा मध्ये समाधान मानणं हे असामान्य आहे. तिथे समाधी वर मात्र मी आणि सगळ्यांनीच डोकं टेकलं, नतमस्तक होण्या सारखंच आहे ते ..

तिथे त्या रहिवाश्यांचं कॅन्टीन आहे, म्हणजे जिथे लोक जेवतात, आम्हाला ते पाहायला घेऊन गेले. स्वच्छ, नीट नेटकं , खूप प्रमाणात पोळ्या भाकऱ्या केल्या जातात, भाजी असते , आमटी , कोशिंबीर सगळं. भाज्या इथल्याच काही धान्य लागलं तरच बाहेरून. भाज्या चिरल्या कि त्याच साल म्हणा , टरफल म्हणा सगळं ते प्रोसेस करून बायो गॅस, आधी सांगितल्या प्रमाणे बुधवार सगळं बंद असत, तेव्हा इथे बाजार भरतो. तो सगळा ओला कचरा आणून बायो गॅस केला जातो, सोलार पॅनल आहेत .... १०० टक्के उपयोग, स्वावलमभन,  स्वाभिमान , सम्मान..

त्यांच्या सगळ्या वस्तू आहेत ते विकायला दुकान आहे इथे, छान आहे, कष्ट करून पैसा कमवा, साधं सोपं सरळ. मग समोर आपल्या साठी जेवणाची जागा आहे, तुम्ही ताट वाट्या घ्या, अन्न वाढून घ्या, परत घासून जागेवर ठेवा. साधा सोपं करून ठेवलय, आपण फॉरेन मध्ये बघतो तस आहे सगळ, सगळ्यांना सेम वागणूक, काम वाटून दिलेली सगळी जण सगळी काम करतात.

आम्ही मग जेऊन हेमलकसा चा प्रवास सुरु केला ... अजून एक दिवस तरी थांबायला हवं असं वाटत होत .. काय नवल आहे, आपण रिसॉर्ट ला सुद्धा कंटाळतो, इथे तस करमणूकी साठी काही नसताना माणूस रमतो .. धन्य आहे सगळ बाबा  ....

अमेरिका १२- universal studios १

मी ज्या देशात जातो त्या देशात जमलं तर सगळ्या प्रकारच्या   transportation चा उपयोग करायचा प्रयत्न करतो. अमेरिकेत बहुदा सगळेच गाड्या घेऊन फिरतात. फार काही पब्लिक ट्रान्सपोर्ट नाहीचे. मोठ्या शहरात आहेत पण बाकीच्या ठिकाणी मेट्रो, ट्रेन्स नाहीत, साधी बस सुद्धा नाहीये. मी आपला उबर झिंदाबाद होतो. पण, कॅलिफोर्निया मध्ये मी अमेरिकन मेट्रो ने पण प्रवास केला आणि  ट्रेन ने पण (आपल्या सारखीच आहे, मला वाटलं अमेरिकन म्हणजे वेगळी असेल) . 

युनिव्हर्सल स्टुडिओ. 

माझी मावस बहीण स्वाती जिथे राहते तिथून लॉस अँजेलिस साधारण तास भाराच्या अंतरावर आहे, काही कारणाने ती येऊ शकत न्हवती म्हणून मी ट्रेन ने LA ला जायचं ठरवलं. सकाळी दोन आणि संध्याकाळी परत त्याच दोन एवढ्याच फक्त गाड्या आहेत, तिच्या घरापासून च्या जवळच्या स्टेशन वरून जाणाऱ्या. सकाळी सात ची गाडी होती आणि सवई प्रमाणे (आम्ही भाऊ बहीण सेम ना म्हणून) मी साडे सहा ला स्टेशनात, स्वातीनेच सोडल स्टेशन पर्यंत. (त्या दिवशी गाडी दहा मिंट लेट होती).  स्टेशनवर एक किऑस्क होत त्यातनं टीकेत घेतलं (मग ते दिवसभर जीवापाड जपलं) आणि प्लॅटफॉर्म वर गेलो. त्या स्टेटशनात एकच प्लॅटफॉर्म, तुरळक माणसं. मग प्रश्न पडला, कि ह्या बाजूची ट्रेन का त्या बाजूची? सगळंच उलट ना हो? आपण डावीकडून गाडी चालवतो, हि लोक उजवीकडून, म्हणजे बघा माटुंगा स्टेशन जर उदहारण घेतलं तर डावी कडे जाणारी गाडी बोरिवली आणि उजवीकडली चर्चगेट, म्हणजे मेन स्टेशन, पण इथे कस असणार? हे कळत न्हवत , मग माला एक साठ पासष्ट ची रेल्वे चा युनिफॉर्म घातलेली बाई दिसली, तिला विचारलं, ती म्हणाली थांब ह्याच्या आधी एक गाडी येईल मग तुझी गाडी उजवीकडे, म्हंटल बर, दहा मिनिटाने एक गाडी आली, ती बाई लांबून मला हातवारे करून ..नाही हि नाही .... त्या अमेरिकेत पण काळजी घेणारी लोक आहेत हे कळलं, मग ती गाडी गेल्यावर शेजारीच येऊन उभी राहिली, कुठे जातोयस? म्हंटल युनिव्हर्सल ला,  "मजा कर" मग  मला म्हणाली कि इथे amtrak नावाची गाडी पण असते, पण ती इथे थांबत नाही, लॉस अँजेल्स वरून येताना ती गाडी घायची नाही, आता गाडी येईल तुझी,  त्यात बस आणि शेवटच्या स्टॉप ला उतर, मी येस थँक यु असं म्हंटल, नो प्रॉब्लेम म्हणाली आणि परत एकदा विचारल, amtrak  पकडायची? मग मी "नाही" अस म्हणालो, तर काय गोड हसली म्हातारी. तेवढ्यात गाडी येताना दिसली, तुझी गाडी  "have a nice time"  .... मी गाडीत चढलो, रिकामी होती, सुट्टीचा दिवस म्हणून रिकामी असेल . दोन चारच  लोक होती , मग मी एका खिडकीत बसलो आणि मग पाच मिनिटाने दुसऱ्या मग तिसऱ्या , रिकामी गाडी बघायची सवयच नाही ना, म्हणून भिरभिरलो ....

तासाभरात गाडी LA Central ला पोचली, एकदम भारी वाटलं, दादर सारखं ब्रिज चढायला गर्दी, मी खुश. इथे escalators आहेत आणि लोक उगाच धक्का बुक्की करत नाही. त्या मुळे चीड चीड नसते आणि त्यात वातावरण थंड. गाडीतून उतरल्यावर रुमाल काढून घाम पुसायचा न्हवता. वर जाऊन कळल कि तिथे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि मी चालून मुख्य स्टेशनात आलो. म्हणजे आपलं चर्चगेट बघा कस आहे? किव्हा CSMT? सगळ्या प्लॅटफॉर्म वरून आपण मुख्य ठिकाणी येतो आणि मग तिथे हॉटेल्स आहे तिकीट खिडकी सौचालय आहेत, तसेच. फक्त आपण सरळ जातो, इथे आपण खालून वरती येतो. वरती आल्यावर तुम्ही डावी कडे जाता किव्हा उजवीकडे, पण दोन टोक. म्हणजे चर्चगेट ला उतरून तुम्ही त्या  c रोड कडे निघालं किव्हा सरळ इरॉस नाहीतर पाठी आयकर, मी थोडा गोंधळलो, कारण  म्हंटल जर मला NCPA  ला जायचं असेल आणि मी जर पाठून आयकर ला गेलो तर फार लांब पडेल. म्हणून बाहेर जाऊन एका पोलीस ला विचारल कि मला युनिव्हर्सल ला जायचंय तर उबर कुठून करू? इथून का त्या बाजूने? (मेक्सिकन होता तो, म्हणजे इथे मेक्सिकन लोक पण खूप आहेत, ते स्पॅनिश बोलतात जास्त ) कुठे जायच आहे नक्की? म्हंटल युनिव्हर्सल बघायलाच, कुठून आलास? कसा आलास? चायला पोलीस म्हणजे काय  असे प्रश्न विचारात सुटायचं काय? (मी म्हंटल, मानत) त्याला गप गुमान  ट्रेन म्हंटल, तसाच सरळ परत जा .. आ? मला काही कळेना, हसला तो, म्हणाला अरे आत गेलास कि डावीकडे स्टार बक्स आहे (स्टेशन, विमान तळ, बोट रस्ता मॉल , सगळीकडेच आहे म्हणा) तिथून खाली उत्तर, तुला मेट्रो मिळेल ती थेट युनिव्हर्सल ला जाईल चार डॉलर, उगाच कशाला उबर (चांगला होता पोलीस असून) ? बर आहे म्हंटल उबेर २२ डॉलर सांगत होता, हे फारच सोपं होत, मला ट्रेन आवडते (मुंबईत तुम्हाला आवडावीच लागते), लगेच आत गेलो तर डावीकडे एक मोठी वेडी बाई होती, तिथेच स्टेशनात खाली प्लास्टिक ची पिशवी घेऊन बसली होती आणि मोठं मोठ्याने बोलत होती... माझ्याच कडे बघून ओरडत होती (असा भास झाला मला), मी धूम ठोकून खाली गेलो तर खूप मशिन्स, तिथे फुल डे तिकीट ७ डॉलर कुठून हि कुठे, तेच काढलं, उगाच दोनदा का काढा म्हणून? ते काढून कुठची गाडी पकडायची म्हणून वळलो तर एक भिकारी बाई (ती पण मोठी आणि काळी) मला मदत करशील का एक डॉलर? थोडा पुढे एक माणूस खाली बसून एक टक आढ्या कडे बघत होता, खाली भीक द्या अशी पाटी होती. मी तसाच खाली गेलो तर दोन प्लॅट फॉर्म, एकात गाडी एकात न्हवती, नशिबाने एक माणूस तीथे एक स्टाफ साठी केबिन केली तिथे होता, त्याला विचारल कि युनिव्हर्सल ला कोणती जाते गाडी? तर स्पॅनिश मध्ये बोलला, मी म्हणालो अरे इंग्लिश बोल, ती गाडी आहे उभी तीच शेवटून दुसरं स्टेशन, चढ सुटेल आता, मी चढलो गाडी भरली होती, पण एका बाकावर टेकलो तेच दार बंद झालं आणि गाडी सुटली. आजू अबाजुची माणसं बघत होतो, थोडी गरीब टाईप्स होती सगळी, आणि एकदम कुणी तरी गुड मॉर्निंगssssssss असं ओरडलं कुठून आवाज येतोय हे बघायला मन वळवली तर एक अर्ध नग्न वेडी बाई मोठ्याने हसायला लागली आणि मधेच गुड मॉर्निंग अस ओरडायची, काही खर नाही म्हणून दार बघूया आणि उतरू असं मनात आणे पर्यंत माझाबाजूला बसलेला माणूस पण मोठ्याने हसायला लागला, मी शेपटीला लवंगी लावल्या सारखा उडालो आणि डायरेक्ट दारात, नशिबाने लगेच गाडी स्टेशनात आली होती (चर्चगेट ते मारिन लाईन्स, जेवढं अंतर तेवढच असेल ) आणि वायूवेगात उतरून एक डबा सोडून दार अगदी बंद होयच्या आत, दुसऱ्या डब्यात घुसलो आणि सगळ्यांनी कपडे घातलेत का? वेड्या सारखं कुणी आहे का हे बघितलं आणि पुढल्या स्टेशनात गाडी येई पर्यंतदारा जवळ उभं राहून काही धोका नाही ना? हे पाहून मग दारा जवळची एकटी असलेली सीट पकडली.

मला वेड्यांची फार भीती वाटते (अशी तर मला खूप  गोष्टींची भीती वाटते पण ह्या लोकांची जास्त), राग नाही येत, पण त्यांच्या actions  वर त्यांचा ताबा नसतो, म्हणून भीती, ती कुठे बघतात हेच काळत नाही त्यांचा राग कुणावर असतो हे माहित नाही  कुणावर काढतील हे सांगता येत नाही आणि अमेरिकेत ही माणसं एक तर आड दांड आणि त्यात ती निग्रो तर अणिकच. मोठ्या शहरात मला नेहमी वेडी माणस दिसतात, का माणस मोठ्या शहरात येऊन वेडी होतात? का शहर त्यांना वेड करत? का वेडीच माणस शहरात राहतात का वेडच वाहायला इथे येतात? मी असं का वेड्या सारखा विचार करतोय? इथली वेडी माणस ऍक्टर वाहायला तर आली नसतील ? काय वेड्या सारखच आहे सगळ ..... 

असाच सारखा वेड्या सारखा विचार करून मी शेवटी त्या युनिव्हर्सल स्टेशन ला उतरलो, पण गाडीतली माणस सगळी बेताच्या परिस्तिथी असलेली वाटली, त्या मनानें मी स्वाती कडून इथे आलो ती माणस सगळी सुख वस्तू वाटली. स्टेशन नेहमी सारखं खाली भुयारात, वर आलो तर सगळं विश्वच निराळं, म्हणजे एकदम मशीद बंदर ते डायरेक्ट कफ परेड ... सगळंच भारी, परत गोंधळ .. युनिव्हर्सल स्टुडिओ तर कुठे दिसत न्हवता, परत एक पोलीस  (माणूस नाहीच कि हो), त्याला म्हंटल कि मला ... युनिव्हर्सल साठी तो ब्रिज चढा आणि उतरल्यावर त्यांची गाडी तुम्हाला (फुकटं) त्या स्टुडिओत घेऊन जाईल असं तो पोलीस म्हणाला, मला  वाटलं मन कवडाच आहे, पण माझ्या पाठी चार लोकांना त्यांनी हेच आधीच सांगितलं, कारण त्या स्टेशनात दुसरं काही नाहीच कि ओह ...

मग मी तो ब्रिज उतरलो आणि पाच दहा लोंकान बरोबर त्या बस ची वाट पाहत थांबलो. एक पाच मिनटात एक मोठी टुमदार लहान मुलांना आवडेल अशी चार डब्यांची बस हळू हळू येताना दिसली, त्यात आम्ही लोक बसलो आणि मग ती बस युनिव्हर्सल कडे निघाली, त्या बस मध्ये स्पीकर होते ते सगळं सांगत होतेच, कि इथे बघा तिथे बघा, एकदम पॉश सगळं, मग तुम्ही आता युनिव्हर्सल जात आहात, अस म्हणत ती बस एक ५०० मीटर जाऊन थांबली, मग ती बाई म्हणाली कि सरळ जा, तिकीट काढा म्हणजे थेट युनिव्हर्सल .. मी आधी उतरून बाथरूम शोधलं , म्हंटल आत असेल नसेल काय ठाऊक, मला जायला मिळेल न मिळेल, लगेच समोर दिसलं, आत गेल्यावर नव्वद टक्के भारतीय, सगळेच हा माझ्या सारखा विचार करून आले असावेत. तिथे लॉकर होते, तुमचं सामान ठेवायला, फार महाग न्हवत, पण सामान पण न्हवत माझ्या कडे. पण सोय चांगली होती.

तिकिटाच्या आधी मोठी रांग, security करतात... माझ्या कडे फक्त एक छोटी गळ्यात अडकवायला बॅग होती म्ह्णून मला पण security चेक करायला लागल, पण खूप गेट्स आणि शिस्थ ह्या मुळे सगळं दाहा मिनटात झालं, आदल्या रात्री मी online तिकीट काढलं होत म्हणून डायरेक्ट आत गेलो, म्हणजे त्या माणसाने ते चेक केलं आणि मी एकदम universal ... स्वप्नात पण मी इथे येईन असं वाटलं न्हवत, पण मी आलो ह्याच श्रेय स्वाती ला आहेसच, ती नसती तर मी कॅलिफोर्निया ला आलोच नसतो, पण अमित, म्हणजे अंजली माझी मैत्रीण तिचा नवरा, आता तो पण मित्र आहेच त्याने मला आग्रह करून सांगितलं होत कि अरे तू अमेरिकेत आलाच आहेस तर universal  ला जाच , असं अगदी बजावून सांगितलं म्हणून मी म्हंटल ठीके बघू जमलं तर आणि हे असताना स्वपना मला म्हणाली कि अमेरिकेत गेलास आणि आता कॅलिफोर्नियात तर युनिव्हर्सल ला जाच जा म्हणजे जाच, आता हि दोघे एवढे म्हणाले म्हणून मी खरा तर जाऊ म्हंटल, पण जाता क्षणीच, मी आलो ते फारच बेस्ट केल ह्याची मला खात्री पटलीच, पण एकदम एवढं भव्य बघून भारावून गेलो ....


क्रमशः





















Monday, June 3, 2019

घुलामी 2 -- फिनिक्स अरेझोना अमेरिका

इथे हर्ड मुसीयम मध्ये हे मला पाहायला मिळणार म्हणून मी आलो .... इथे दोन भाग आहे, एक म्हणजे इथला इतिहास आणि इथली (म्हणजे इंडियन्स ची)संस्कृती .. इतिहास गोऱ्या साहेबानी लिहिलाय आणि संस्कृती तोच गोरा साहेब दाखवतो आपण यातून बोध घायचा ... .. 

v

अमेरिकेत एक चांगलंय म्हणजे लोक तोंड भरून तुमचं स्वागत करतात, खर खोट  असं काही नसतंच, मी जेव्हा त्या हर्ड म्युसियम ला गेलो तेव्हा त्या तिकीट कॉउंटरच्या बाईने तोंडभरून स्वागत केलं (टिचून १२६० रुपये घेतलेत, न करायला   काय जातय?). माझ्या दोन्ही बॅग (फुकट)लॉकर मध्ये ठेऊन घेतल्या तिथे, ते बरं झाल त्या मुळे मी मोकळा झालो. 



आधी सांगितल्या प्रमाणे इथे दोन भाग आहेत, एक म्हणजे इतिहास आणि दुसरा म्हणजे कला संस्कृती. एक बरं म्हणजे इथे फुकट टूर्स होत्या , दोन. एक ह्या भागाची आणि एक त्या. मी नेहमी गाईड करतो, माझा (भारताचा ) इतिहास जरा बरा असला तरी लोकल माणसा कडून तो ऐकण्यात मजा असते म्हणून मी गाईड करतो. (जयपूर ला गेलात तर त्या जंतर मंतर ला नक्की गाईड करा एरवी ते ५ मिनटात बघून होईल पण गाईड तुमहाला तास भर फिरवेल आणि जन्म भराची माहिती सांगेल). आणि इथे मला अजिबात इतिहास आणि भूगोल माहित नाही, परत २५ डॉलर (२००० रुपये) खाली काही नाही इथे , त्या मुळे फुकट म्हणून मला फार आवडलं.  

इतिहास च्या भागात आहे तो आधी होता, सुरवातीला त्या गाईड ने आम्हाला थोडी कलाकृती दाखवली, कुणी एक जर्मन माणूस होता तो आणि त्याची बायको मेक्सिको ला जाऊन आले आणि मग त्याने प्रभावित होऊन खूप चित्र काढली वगैरे, थोडच नक्षी काम होत फार नाही. आपण भारतात फार जास्त नक्षी काम पाहतो म्हणून मला फार काय त्यात कौतुक नाही वाटलं, पण त्या माणसाने चित्र मात्र छान काढलं होत. मग तो आम्हला पहिल्या मजल्यावर घेऊन गेला आणि एकदम वेगळच चित्र डोळ्या पुढे आलं. हा गोरा साहेब किती क्रूर आणि दुष्ट होता हे त्याने स्वः सांगितलं आणि तिथे तस दाखवलं आहे. इथे आधी साहेब आला मग सगळेच आले जर्मन, फ्रेंच, डच आणि सगळेच  (स्पॅनिश मेक्सिको मध्ये गेले किव्हा दक्षिण अमेरिका आणि त्यांना वाईट ओरबाडले आणि गुलाम केले, इतके कि ते स्वतःची भाषा विसरून स्पॅनिश बोलतात आणि तीच मूळ भाषा समजतात ) . पण सगळ्यात जास्त दुष्ट पणाचा मान हा साहेबाचा, हिटलर पण भुरटा चोर वाटेल इतका अत्याचार ह्या साहेबाने केला. मी नेहमी म्हणल्या प्रमाणे हा देश इतका मोठा आहे कि भारता पेक्षा अडीच पट, म्हणजे लोक जास्त जाती जास्त गाव जास्त, म्हणून इथे ते कबिले वेगळे, भाषा वेगळ्या रीती वेगळ्या, कपडे वेगळे ... फक्त एक मेकांना शत्रू मानणे ह्या एका गुणावर ते जोडले गेले होते ... साहेबाने ह्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांची कत्तल करायला सुरुवात केली. भारतात इतकी माणसं ह्यांनी मारली, हा देश तर आपल्याहून अडीच पट  मोठा, म्हणजे किती माणस मारली असतील? आपण तरी बऱ्यापैकी जोडलेले  होतो, म्हणजे काश्मीर असो वा कन्याकुमारीमहाराष्ट्र  असो का बंगाल लग्न करायची पद्धत एकच श्लोक सगळे संस्कृत, संस्कृती एकच. इथे ह्याचा अभाव, म्हणून एक एक कबिला धरून त्यांना घुलाम करुन मारून टाकणं फार सोपं गेलं. मग  एका सुपीक (आणि क्रूर) डोक्याच्या माणसाला एक आयडिया आली, ती म्हणजे लहान मुलांना पकडा, त्यांचं घर तोडा, जात ख्रिश्चन करा , भाषा इंग्रजी करा, शिक्षण पाश्चात्य करा आणि इतिहास आपलाच शिकवा .....म्हणजे हाच माणूस त्यांच्याच माणसांना मारेल आणि आपलीच भाषा बोलेल म्हणजे आपलं काम सोपं .  ह्याच कारण म्हणजे खर्च कमी होईल, खर्च कमी होईल? मारताना गोळ्या वगैरे लागतात आणि साहेब पण एखादा मारू शकतो, उगाच का गोळ्या वाया घालवा कष्ट करा . दुसरं आणि मुख्य कारण म्हणजे पुढची पिढी घुलाम होईल . आपल्या कडे फक्त इंग्रजी बोलणारे लोक हे घुलाम आहेत हे मला पटल. मातृ भाषा हि आलीच पाहिजे, इंग्रजी महत्वाची आहेसच, पण मातृ भाषा येणं हे जास्त महत्वाचं.मिशनरी शाळेने ही काम चोख बजावलीत (अगदी भारतात सुद्धा). 



पाच सहा वर्षाचं पोर, त्याचे आई बाप लांब करा घर थोडा, मोकळ्या जागेतून बंद खोलीत आणा, धर्म बदला भाषा तोडा, उपाशी ठेवा आणि जे साहेबांचं उरेल ते त्या लाहानग्या पोरांना द्या.वाढत्या वयातली पोर असतील त्यांना उपाशी मारा, एखाद्या चिमुकल्याला आई भरवत असेल तर त्याला बेचव जेवण ताटात वाढा लाड नाही, फक्त मार आणि शिस्त. एका विशिष्ट प्रकारची शिटी मारली कि मूल उठायची , दुसऱ्या प्रकारची मारली कि मुलं जेवायची , अश्या शिट्यांने त्यांचं आयुष्य बांधलं गेले होते.... आई बापाला भेटू द्यायचे नाही,  ती    माउली दुःखाने मरत असेल. त्या बोर्डिंग शाळेत एका खोलीत चिकटून अनेक मूल झोपायची, रोगाने कित्तेक मारायचीत. आणि त्यांना तिथेच पुरले जायचे आणि त्यांच्या पालकांना एक पत्र, ज्यात असं लिहिलं असायची कि छान आणि शांत त्रास न होता शूरवीर मरण आलय. 

हे सगळ दाखवणारे अनेक फोटो होते  आणि तो गाईड पण पोट तिडकीने सगळं सांगत होता, खूप सुन्न करणार होत, तूर संपल्यावर मी ते परत सगळ पहायला आलो. दोन चार गोष्टी परत वाचल्या त्यातल एक वाक्य मनात राहील "Erase and Replace" . म्हणजे त्या लहान मुलांचं आधीचा इतिहास पुसून टाका आणि नवीन इतिहास डोक्यात भरा.... आधी त्या मुलाच नाव बदला मग त्याचे केस कापा, इथे सुद्धा आई बाप गेल्यावर केस कापायचे असा नियम होता, म्हणजे त्या लहान मुलांच्या मनावर मोठा आघात , मग त्यांचा धर्म बदला आणि मग भाषा शिकवा. एक माणूस घुलाम म्हणजे पुढची पिढी घुलाम साहेबाने हे सगळीकडेच केलं,. 

भारतात खूप दिसत असं ... जुना इतिहास नाहीच आणि नवीन कसा खरा हे लोक पटवून देत लोक फिरतात .... इतिहास फक्त गेली १०० वर्ष आधीच सगळं खोट ... म्हणजे नुसतं इंग्रजी बोलता आलं म्हणजे जी लोक स्वतःला उचभ्रु समजतात ती घुलाम असतात का? 

मग मी बाकीचा मुसियम बघितला आणि यात मग लोकल handicraft होते, इथे खूप लोकांना बंदिस्त करून ठेवलं होत अगदी १९३० पर्यंत तायतलाच एक माणूस पुढे मूर्तिकार झाला मग याची मूल पण मूर्तिकार. मग तो मुसियम कुणी बांधला हा इतिहास. हर्ड नावाच्या कुटुंबाने तो बांधला आहे , अति श्रीमंत माणूस होता त्याची बायको आणि त्याने बांधलाय. म्हणजे बाई श्रीमंत होती आणि ह्या माणूस तिच्या वडिलांकडे नोकरी करायचा मग त्या बाईशी लग्न करून श्रीमंत झाला वगैरे..... पण त्याच्या इतिहासात मला रस न्हवता. त्या लोकल लोकांच्या हातमागाचे काही काम ठेवले होते , मग चित्र कला आणि काय काय ... 

हे सगळं झाल्यावर मग मी दुसरा भाग पाहायला गेलो तसच तास भर, पण ती सगळी कलाकृती ते आधी कसे राहायचे भांडी कुंडी स्वयंपाक कसे करायचेत वगैरे .... मी कंटाळलो थोडा , कारण तिथे खूप ववीवीध प्रकारचे लोक काबिले त्यांचे कपडे राहणी वगैरे तेच तेच होत .. एक गमतीचा भाग म्हणजे त्या आदिवासी बायकांना कपडे घालायची सवय न्हवती, म्ह्णून इंग्रजाने त्यांना सांगितलं कि बाजारपेठेत येताना पान लावून या... मग त्या बायका बाजारपेठेत कपडे घालायच्या आणि वाटेत जाताना ते लगेच काढून टाकायच्या . साहेब कपडे घाला म्हणून सांगत होता ... हे ऐकून गम्मत वाटली, आता ह्यांना कपडे घालायची फार जाण नाहीये, म्हणजे कपडे काढण्याची सवय ह्या गोऱ्यांना त्या दिवासींनी लावली म्हणायची ... 

दोन अडीच तास फिरून दमलो होतो , जरा टेकलो नि निघालो परत. पण घुलामी बद्दल बराच ज्ञानी झालो, आपलं नशीब चांगलं आहे कि आपण अजून मराठी बोलतो , लिहितोय वाचतोय .. स्वतःच अस्तित्व टिकवून आहोत ... 

फार इंग्रजी इंग्रजी करू नका आपण काही गोरे नाहीत, त्या मुळे आपण इंग्रजीचा हट्ट धरण म्हणजे घुलामी चा हट्ट करण्या सारखं आहे . 










Monday, May 20, 2019

घुलामी 1 -- फिनिक्स अरेझोना अमेरिका

घुलामी :

मी सवयीचा गुलाम आहे, कुठे जायचं असलं कि रात्री झोप नाही, गजराच्या आधी दोन तास उठायचं आणि गजर वाजे पर्यंत कुशी बदलत जागायचं. आता खरं तर मी हल्ली दर आठवड्याला दर बदल करत असतो, पण तरीही ९ च्या विमानाला ७ ला एअरपोर्ट गाठायचा हि सवय आणि त्यामुळे चार ला उठायचं. तर आज मी असाच साडे सातला निघायचं म्हणून मध्य रात्री पासून जागा राहून एअरपोर्ट ला पोहोचलो आणि मला कळलं कि विमान रद्द आणि कहर म्हणजे मला जी फ्लाईट दिली ते रात्री ११. म्हणजे सकाळी सात ला विमान आहे म्हणून नीघालेला मी आता १४ तास करू काय ह्या संभ्रमात पडलो . जरा गाव हिंडून यावं म्हंटल आणि उबर शोधायला मोबाईल बघितला तर मला साडे पाच ला sms होता, विमानाची वेळ बदलल्याचा. पण इथे अमेरिकेत नवीन नंबर त्या मुळे sms कोण बघतोय आपण whatsapp चे गुलाम . 

अर्धा तास चीड चीड करून (स्वतः वरच, इथे कोण विचारतय मला?) मी शेवटी त्या बाईला विचारलं कि कुठे फिरू शकतो का? ती म्हणाली कि ह्या विमान तळावरच्या शटल नी जा म्हणजे बाहेर तुला मेट्रो मिळेल, चार डॉलर मध्ये दिवस भाराचा पास मिळतो. मग मी चार मजली escalatar चढून गेलो तर नुसती ह्या टर्मिनल पासून त्या टरमीनल ला जाणारी शटल. आता शटल म्हणजे खर तर मेट्रोच आहे. मी गोंधळलो, शेवटी एका माणसाला विचारलं (माझा अजून माणसा वरच जास्त विश्वास आहे) कि अरे गावात जायचंय (गाव म्हणजे शहर) कस जायचं? त्यांनी एकदम सविस्तर सांगितलं, आधी हि विमानतळावरची मेट्रो घे दोन स्टॉप जा , मग उत्तर, एक दोन माजली escalator लागेल ते उत्तर, मग समोर एक मोठा ब्रिज दिसेल तो पार कर, तो संपला कि खाली उत्तर, ते स्टेशन त्या मेट्रो च ..... (हे सगळं गूगल बाई नाही सांगत, इथे तर head north west take second exit असं म्हणते मला डावीकडे उजवीकडे कळत ईशान्य , नयऋत्य म्हणलं कि भोवळ येते) तर मी तसाच गेलो आणि बरोबर उतरलो. पण मला काय ते टीकेत मशीन टीकेत देईच ना, म्हणजे माझं कार्ड ते घेतच न्हवत आणि माझ्या कडे चार डॉलर सुट्टे न्हवते , तेवढ्यात तिथून एक मुलगी आली, ती त्या मेट्रो मधेच काम करणारी होती, तिने पण प्रयत्न केले, पण नाही , अजिबात ते मशीन कार्ड घेत न्हवत , मग तिने शांत पणे दोन नाणी खिशातून काढून मला तिकिट दिल, मी म्हण्टलं अरे असं काय, असू दे म्हणाली, मी म्हंटल थांब मी बघतो थोडे सुट्टे आहेत का , तर दोन नोटा मिळाल्या एक डॉलर च्या मी बळेच तिले दिले, ती नाहीच म्हणत होती, शेवटी घेतले आणि म्हणाली कि वचन दे कि तू पण अशीच मदत कुणाला तरी करशील. pass on the kindness :). सगळं अजब आहे इथे, एरवी कुणी तुम्हाला विचारात पण नाही आणि इथे हे असं, म्हणूनच हा देश तरलाय, तरलाय कसला? चांगलाच बहरलाय ..त्या दिवशी जेम्स आणि आज हि ...तेजस नी सांगितल्या पासून सारखेच एंजेल भेटायला मला :). 

मग तीच मुलगी मला इथे जा तिथे जा सांगत होती, पण माझ्या कडे भली मोठी बॅग होती (केबिन बॅग पण कपडे होते त्यात दोन आठवड्याचे), कुठे फिरू म्हंटल, मुसियम वगैरे आहेत ना? खूप आहेत सायन्स आर्टस् कल्चर इतिहास सगळेच . बघून ये म्हणाली दोन चार आणि दोन चार ठिकाणची नाव सांगितली .  मी बघतो म्हणालो. मग सवयी प्रमाणे एक स्टेशन आधी उतरलो, पुढच्या गाडी करता थांबलो आणि मग करेक्ट ठिकाणी गेलो. ही मेट्रो म्हणजे ट्राम सारखी आहे, रस्त्याच्या मधून असते, रूळ असतात, पण रस्त्यातून जाते, म्ह्णून जिने चढा उतरा असा प्रकार नाही. माझ्या कडे बॅग होती त्या मुळे  मी हर्ड मुसीयम मध्ये जायचं ठरवलं , दोन कारण, एक म्हणजे इथे आधी राहायचे त्या लोकांचा इतिहास, ज्यांना ही लोक इंडियन म्हणतात ते त्यांचा इतिहास आणि त्यांची कलाकृती इथे होती आणि दुसरं म्हणजे ते मुसियम स्टेशन जवळ होत, त्या मुळे मी माझी बॅग सहज ओढत नेऊ शकत होतो (बाकीचे सायन्स ची ठिकाण होती आणि मी सायन्स पेक्षा कला आणि इतिहासात रमणारा आहे, हे तिसरं कारण, थोडं जास्त खर). 

इथे आल्यापासून मला एक मोठी उत्सुकता होती कि इतक्या मोठ्या जागेत राहायचं तरी कोण? म्हणजे जिथे एका टोका पासून दुसऱ्या टोका पर्यंत ३ ते ४ तास (विमानाने) जायला लागतात तिथे कोण राहायच? निर्मनुष्य तर नक्कीच नसणार, भाषा तरी काय होती? ही लोक इंडियन म्हणतात पण आपण इथे न्हवतो..कधीच ...  मग? तो कोलंबस इंडिया शोधायला गेला आणि तो इथे आला आणि इथल्या लोकांना इंडियन म्हणाला म्हणून हे इंडिअन? फक्त केस काळे आणि गोरे नाहीत म्हणून इंडियन? मेक्सिको मध्ये सगळे स्पॅनिश बोलतात कारण स्पेन ने इथे इसवीसन १६०० ते १८५२ पर्यंत राज्य केले आणि ह्यांना ओरबाडून नागवे केले, तरी ते स्पॅनिश बोलतात मूळ भाषाच नाही. पण ते खाली होते इथे थंडीत बर्फात कोण होतं? इथे वाळवंट पण आहे तिथे कोण होत? जंगलात कोण होत? दर्या आहेत डोंगर आहेत मोठी माळ रान आहेत (होती) तिथे कोण होत ? खूप प्रश्न होते आणि मला नकळत इथे थोड्या प्रश्नाचा उलगडा झाला. 

हे हेर्ड मुसीयम म्हणजे तथाकथित इंडियन लोंकाची संस्कृती आणि इतिहास दाखवणार एक मुसीयम, दहा बारा हजार स्केयेर फुटात दहा बारा शतकांचा इतिहास दाखवण्याचा (केविलवाणा) प्रयत्न आहे ... आपण खूप बरे.  आपण इतके आघात , आक्रमण सहन करून संस्कृत जपलं, कितीही लोकांना खोटं वाटलं तरी रामायण, महाभारत जपलं पुराण, जपली, वेद बहुरू दिलेत नवीन कल्पना स्वीकारल्या सगळ्या भाषा जपल्या आता जलद गतीने गुलाम गिरी कडे चाललोय ते सोडा, पण आपण अजून १४ अधिकृत भाषा बोलतो त्यांच्या पोट जाती १४०० त्यांची स्वरूप १४०० ते सगळं जपलय,  खूप जपलं, इथे येऊन त्या आधीच्या जे कुणी असेल त्यांचा इतिहास नेस्तनाबुत झालेला पाहून वाटत कि आपले पूर्वज खरच महान होते .... जितक विज्ञान पुढे जायला महत्वाचं तितकाच मुळांना बळकट करायला इतिहास गरजेचा .. इंग्रजी शिकण्याकरता मराठी विसरायचं कारण नाही हे इतिहास शिकवत.  आईची ममा झाली तरी माया हि आईची असते हे तीथे ममा चा हग (काय पण शब्द निवडलाय) कमी पडतो ... असो  

इथे हर्ड मुसीयम मध्ये हे मला पाहायला मिळणार म्हणून मी आलो .... इथे दोन भाग आहे, एक म्हणजे इथला इतिहास आणि इथली (म्हणजे इंडियन्स ची)संस्कृती .. इतिहास गोऱ्या साहेबानी लिहिलाय आणि संस्कृती तोच गोरा साहेब दाखवतो आपण यातून बोध घायचा ... .. 

क्रमशः